दिवेआगर समुद्रकिनारी हाऊसफुल गर्दी
कोरोना संकटावर मात करत पर्यटक उत्साही
आठ महिन्यानंतर रेकॉर्डब्रेक गर्दी
बोर्लीपंचतन (मुझफ्फर अलवारे) : प्रत्येक विकेंडला कोकणातल्या पर्यटन ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळतेच मात्र, आठ महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या पर्यटनाला या महिन्याच्या शेवटच्या रविवार विकेंडला दिवेआगर समुद्रकिनारी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली असून पर्यटक उत्साही पाहायला मिळत होते.
श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत. विशेषतः येथील समुद्रकिनारे सुरक्षेच्या दृष्टीने नावाजलेले आहेत. पर्यटनाच्या मुलभूत सुविधांमध्ये प्रसिद्ध असणारे दिवेआगर येथे येण्याची पर्यटकाला उत्सुकता असते. मात्र, दिवाळीनंतर यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असल्याचे येथील व्यावसायिक सांगत आहेत. कोरोनामुळे विविध कारणासाठी लांबलेल्या पर्यटकांची यावेळी हाऊस फुल गर्दी झाल्याने ५०० च्या जवळपास मोठ्या हॉटेल्ससह स्थानिक घरघुती निवास बुकिंग फुल झाल्याची माहिती मिळत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे तांब्याच्या पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडल्याने ह्या स्थानास धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारी जवळ असलेले श्री रूपनारायण मंदिर हे देखील दर्शनीय आहे. यामुळे मंदिरे खुली केल्यापासून भाविक व पर्यटक यांची गर्दी होऊ लागली. येथील स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. येणारे पर्यटक आपले कुटूंबिय तसेच मित्रपरिवारासह पाण्यात मनसोक्त डुबकी मारण्याची मजाही बिनधास्तपणे लुटताना दिसतात. या विकेंडला सायंकाळच्यावेळी येथील किनारा गर्दीने फुलुन गेलेला आहे. जवळपास दहा हजार हुन अधिक पर्यटक येथे भेट देत असल्याचे दिसून आले.
दिवाळीनंतर पर्यटकांमध्ये वाढ झाल्याने हॉटेलमधील रेस्टॉरंट्सदेखील सुरू करता आले असे काही व्यवसायिकांनी सांगितले. कोरोना व लॉकडाउनच्या या काळात पर्यटन संकटात आले होते. त्यामुळेच कोरोनाच्या या संकटात कोकणातल्या पर्यटन उद्योगाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली स्थिती यामुळे कोकणातल्या पर्यटन उद्योगाची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. मात्र, यावेळी पर्यटकांच्या रेलचेलने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
दिवेआगर पर्यटनाला अपेक्षित प्रतिसाद
दिवेआगर पर्यटनाला ऑक्टोबरमध्ये सुरवात झाली असली तरी दिवाळी हंगामात पर्यटकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या विकेंडला रविवार पासून पहिल्या दिवशी जवळपास दहा हजार पर्यटकांनी दिवेआगर ला भेट दिली जी आजवरची सर्वात उच्चंकी संख्या ठरत आहे. पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठय़ा हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. यापुढे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची ही रेलचेल नववर्षाच्या स्वागतासाठी अशीच कायम राहणार आहे.