रायगडावरील हत्ती तलावाच्या गळतीच्या दुरूस्तीचे काम वादाच्या भोवऱ्यात, तलाव पडला कोरडा, शिवप्रेमी दाद मागणार!
रायगड विकास प्राधिकरणाचे अपयश
माणगांव (राजन पाटील) : किल्ले रायगडावर नितांत प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली. याकरिता राज्य सरकारने रायगड किल्ला दुरूस्ती व विकसनाकरिता विकास प्राधिकरणाला मोठा निधी उपलब्ध करून दिला. मात्र रायगडच्या विकासात ज्या हत्ती तलावाचे गाळ काढणे, गळती रोखणे, त्यामध्ये पाणी टिकून राहणे याकरिता विकास प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी तसेच विविध प्रकारची रेखाटने करून तलावाच्या गळती दुरूस्तीचे काम केले. त्याकरिता शासनाकडून करोडो रूपयांचा वापर झाला. मात्र आत्ताच्या घडीला या हत्ती तलावामध्ये भीषण वास्तव समोर आले आहे. तलावातील गाळ तसाच असून ऐन ऑक्टोबर महिन्यातच हत्ती तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे या हत्ती तलावाच्या गळती दुरूस्ती च्या कामातील यशस्वीतेबाबत शिवप्रेमींच्या मनात संशय आहे. शासकीय खर्चाप्रमाणे तलावाचे काम झाले आहे की नाही यासाठी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत काशिनाथ ठाकूर व शिवप्रेमींनी याविषयी रितसर चौकशीची मागणी केली आहे.
छत्रपती शिवरायांनी रायगडाची प्राकृतिक रचना व पाण्याचे महत्त्व ओळखून राजधानीसाठी निवड केली. या रायगडावर ८४ पाणी साठे आहेत. दरवर्षी रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी पाहता गडावर पाण्याचा साठा रहावा याकरिता हत्ती तलावातील गाळ काढून त्याची गळती दुरूस्ती करावी याकरिता रायगड विकास प्राधिकरणाने या हत्ती तलावाची गळती सुधारण्यासाठी असलेल्या शोध मोहीमेसाठी व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी व रेखाटने करून अभ्यास केला.
हा तलाव काहीसा उताराला असल्याने पाण्याचा दाब भिंतीला सहन होत नाही. त्याचबरोबर एवढ्या वर्षांनंतर तलावाच्या भिंतीला चिरा पडल्या होत्या. त्यातूनही पाणी गळती होत होती. वेगवेगळ्या टप्प्यात घेतलेल्या निरीक्षणांमुळे गळतीची तीव्रता व ठिकाण समजण्यास मदत झाली. ही गळती थांबविण्यासाठी खास यंत्र बनवून घेण्यात आले. तलावातील संपूर्ण गाळ काढला. तलावाच्या भिंतीना असलेल्या चिरा व तलावाच्या आतील भागातील घळीतून उच्च दाबाने पाणी सोडून स्वच्छ करून त्यामधील पोकळीत सात दिवस भिजवलेला चूना, चांगल्या भाजलेल्या विटांची भूकटी आणि बेलफळाचं पाणी असे मिश्रण आठ ते नव फूट आतील पोकळीत सोडले आणि तलावाची गळती थांबवली हे काम लॉकडाऊनच्या अलिकडे संपले. त्यानंतर १० जुलैला हत्ती तलाव तुडूंब भरल्याचे विकास प्राधिकरणाच्या ठेकेदारांनी व सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता बरूळे, वास्तू संवर्धक वरूण भामरे यांनी विविध वर्तमान पत्रांमध्ये छायाचित्रणासह बातम्या प्रसिद्ध केल्या. या विकास प्राधिकरणाला वाटणाऱ्या ऐतिहासिक क्षणाची पाहणी दस्तुरखुद्द खासदार संभाजी राजे यांनी केली. मात्र याच हत्ती तलावात ऑक्टोबर महिन्यात सर्वच नक्षत्रांचा भरपूर पाऊस होऊनही आत्ता मात्र तलाव कोरडा ठाक पडला आहे. त्यामुळे विकास प्राधिकरणाच्या या हत्ती तलाव दुरूस्तीच्या कामात शिवप्रेमींकडून संशय व्यक्त केला जात आहे.
प्राधिकरणाचे हास्यास्पद खुलासे व शिवप्रेमींचा संशय
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जुलैमध्ये हत्ती तलावात १००% पाणी साठा होता. मग यावर्षी रायगड विकास प्राधिकरणाने हा प्रसिद्धी चा खटाटोप का करावा? तलावतील सगळा गाळ काढला, मग अजूनही त्यामध्ये गाळ कसा दिसतोय? गळती दुरुस्तीच्या कामात काय निष्पन्न झाले? या कामासाठी वापरलेले तंत्र आणि साहित्याबद्दल शंका निर्माण होते मग झालेल्या खराब कामाची जबाबदारी कोणाची? प्राधिकरणाची, सल्लागाराची, की आर्किटेक्टची? मागील वर्षी हे काम पूर्ण झालं नसेल तर मग हत्ती तलाव भरल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडिया व प्रिंट मिडियावर प्रसिद्ध करून श्रेय मिळवून शासनाकडील निधी लाटण्याची प्राधिकरणाने घाई का केली? याचे खरे कारण आहे की, हत्ती तलाव दरवर्षीच पावसाळ्याच्या सुरूवातीला भरतो आणि पावसाळा संपताना तो रिकामा होतो. हे या प्राधिकरणाला माहीत नसावे! पण या खराब कामाची व त्यामागील संभाव्य भ्रष्टाचाराची केंद्रीय पुरातत्व खाते आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने चौकशी करावी अशी मागणी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड .अनिकेत काशिनाथ ठाकूर व शिवप्रेमींनी केली आहे.