हाथरस येथील युवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी याबाबत माणगांव, तळा, रोहा तहसिलदार यांना पँथर संघटनेकडून निवेदन
माणगांव (उत्तम तांबे) :
उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील चांडप्पा गावातील १९ वर्षीय युवती ही तिचे आई व भाऊ यांच्यासोबत १४ सप्टेंबर रोजी शेतामध्ये काम करण्यासाठी गेली असता चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून कोणाला सांगू नये म्हणून तिची जीभ कापून, पाठीचा कणा तोडला व त्याच अवस्थेत हे नराधम तिला टाकून गेले. आईला मुलगी शेतात दिसत नसल्यामुळे आईने शोध घेतला असता ती शेतामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्या घरच्या लोकांनी दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल केली. परंतु ३० सप्टेंबर रोजी या युवतीचा मृत्यु झाला. अशी माणूसकीला काळीमा फासणारी निर्दयी घटना नराधमांनी घडवली. या नराधमांना जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची कठोर शिक्षा व्हावी याकरिता दलित युथ पँथर संघटनेकडून संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या उपस्थितीमध्ये माणगांव, तळा, रोहा येथील तहसिलदार कार्यालयामध्ये १ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.
उत्तर प्रदेश सरकार या झालेल्या घटनेकडे दुर्लक्ष करीत आहे. अशा घटनांमध्ये उत्तर प्रदेश मध्ये वाढ होत असून येथील महिला सुध्दा असुरक्षित आहेत. या युवतीच्या मृत्युनंतर तिचा मृतदेह येथील पोलिसांनी कुटुंबाच्या ताब्यात न देता रात्रीच्या वेळेस मनीषा वाल्मीकीच्या मृतदेहाला पोलिसांकडून अग्नि देण्यात आली असे निर्दयी काम पोलिसांकडून झाले. यामुळे दलित युथ पँथरच्या माध्यमातून भाईसाहेब जाधव यांनी उत्तर प्रदेश सरकार बाबत निषेध व्यक्त करुन या चारही नराधमांना लवकरच फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यता पँथर स्टाईलने आंदोलन करण्याम येईल असा इशारा दिला आहे.
यावेळी निवेदन देताना पँथरचे रायगड जिल्हाध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष मंदेश मोरे, महासचिव रोहित सकपाळ, संपर्क प्रमुख संदीप जाधव, माणगाव तालुकाध्यक्ष रोहन शिर्के, सचिव सुशिल कासारे, रमेश घोगरे, तळा येथील संतोष नाक्ते, सुमन सकपाळ, रफीक कुरुक्कर, शब्बीर कुरुक्कर, अंजली पवार, पांडुरंग गायकवाड, रोहा येथील दिनेश शिर्के, भूषण म्हस्के, सागर जाधव या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.