चक्रीवादळानंतर माणगांव तहसिल कार्यालयाचा प्रताप! 

ज्यांचे काहीच नुकसान झालेले नाही त्यांना मिळाले १ लाख ६० हजार 

प्रत्यक्ष नुकसान झालेले कुटूंब मदतीपासून वंचित 

माणगांव (प्रतिनिधी) : निसर्ग चक्रीवादळामुळे असंख्य नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले; तर अनेक कुटूंब बेघर झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शासनातर्फे आलेला मदतनिधी अनेक नुकसानग्रस्त कुटूंबापर्यंत अद्यापही पोहोचलेला नाही. विशेष म्हणजे अशा भयानक परिस्थितीमध्ये ज्यांचे काहीच नुकसान झालेले नाही अशा कुटूंबांना १ लाख ६० हजारांचा मदतनिधी देण्याची करामत माणगांव तहसिल कार्यालयाने केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे माणगांव तहसिल कार्यालयातील गैरप्रकारांचे धिंडवडे निघू लागले आहेत! 

हे गैरप्रकार लपविण्यासाठी माणगांव तहसिल कार्यालयातर्फे एका वृत्तपत्रांत दिशाभूल करणारी व खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये "माणगांव तहसिल कार्यालय हे मदतनिधी वाटपात अव्वल" असल्याचे खोटे व हास्यास्पद वृत्त छापून आले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र मदतनिधी वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आलेले आहे. 

माणगांव तालुक्यातील महाराणा प्रताप नगर, नाणेरे येथील दिलीप गणपत लोखंडे यांचे तर संपूर्ण घर निसर्ग चक्रीवादळामध्ये जमीनदोस्त झाले. संपूर्ण घराचे नुकसान झाले. घरावरील पत्रे, लोखंडी अँगल, खिडक्या, दरवाजे, यांची संपूर्ण नासधूस झाली. यामध्ये सुमारे २ लाखांचे नुकसान झालेले आहे. 

त्यानंतर सदर नुकसानीनंतर मदतनिधी मिळणेकामी रितसर पंचनामा देखील करण्यात आला. परंतु त्यानंतर दिलीप लोखंडे फक्त रू. २९ हजारांचा मदतनिधी मिळाला. पण उर्वरित रक्कम अद्यापही मिळालेली नाही. आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेले घर पुन्हा पूर्ववत उभे करणे शक्य नसल्याने आम्हास तातडीने मदतनिधी मिळावा अशी मागणी दिलीप लोखंडे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Popular posts from this blog