वनअधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने दक्षिण रायगडमध्ये खैर माफियांचा हैदोस? उच्चस्तरीय चौकशीची मागणी

रोहा (समीर बामुगडे) :

शासनाच्या राखीव वनक्षेत्रावरील खैर जातीच्या वृक्षांची बेसुमार कत्तल होत असताना व वनजमिनींवर अतिक्रमण होत असताना जे ह्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात आवाज उठवतात, त्यांचाच पत्ता कट करण्यात खुद्द प्रशासनच आघाडीवर असतं हे वास्तव समोर आलं आहे. कुंपणच शेत खात असेल तर दाद कुणाकडे मागायची? जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते वरिष्ठ अधिकारीच या कारस्थानात आघाडीवर आहेत का? अशी शंका निर्माण होते. कारण वनउपजावर अतिक्रमण करणारे हे धनदांडगे आहेत. अमाप पैशाने इथल्या व्यवस्थेची थोबाड बंद करण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. हाच फंडा वापरुन गेली अनेक वर्षे दक्षिण रायगड परिसरातील राखीव वनक्षेत्रामध्ये वृक्षतोडीचे अतिक्रमण झाले आहे. आपल्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर खैराची खुलेअाम तोड सुरू असून अधिकारी फक्त बघ्याची भुमिका घेत आहे. इतकेच नाही तर बेकायदेशीर लाकूड वाहतुकीला सुध्दा प्रोत्साहन देत आहे की काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पैसा फेको तमाशा देखो! हे प्रकरण काय आहे याची उच्चस्तरिय चौकशी केली जावी अशा मागणीने आता जोर धरला आहे.

दक्षिण रायगडमध्ये मोठया प्रमाणात  सरकारी वनांतील खैर जातीच्या झाडांची पावसाळ्यात चोरी करुन सदरील माल हा महाडमधील चार मोठया खैर दलाल असणाऱ्या मोठ्या धेंडांच्या घरी साठा करून ठेवाला जातो. रात्री किवा  पहाटेच्या वेळी रत्नागिरीच्या कात कंपनीत तो नेला जातो. दक्षिण रायगड मधील पोलादपुर, माणगांव आणि महाड विभागातील नाते, बिरवाडी परिसरातील या मोठ्या खैर चोरांची पूर्ण माहिती असूनही वनविभाग त्यांना का पकडू शकत नाही? त्यांच्या घरी चोरीचा खैर माल साठा करण्यास वनखात्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे यांचा वरदहस्त आहे का? याची चौकशी करावी. या चोरीच्या व्यवसायात अनेक अधिकारी गुंतलेले आहेत अशी स्थानिक नागरिकांत कुजबुज सुरू आहे. तरी महाड मधील या खैर काटेवाल्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या वनअधिकाऱ्यांची उच्चस्तरिय चौकशी करावी अशी प्रतिक्रिया नारायण खुळे यांनी दिली आहे.

Popular posts from this blog