पाटणूस भिरा, विळे परिसरात मेघगर्जनेसह धुवाधार परतीचा पाऊस 

एक तासात ७६.६० मि.मी. पावसाची नोंद 

अति पावसामुळे भातशेती झाली आडवी, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :

माणगांव तालुक्यातील पाटणूस, भिरा, विळे परिसरात गेले आठवडाभर दररोज सायंकाळी मेघ गर्जनेसह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भात शेती कापण्यास तयार असूनही शेतकऱ्यांना शेती कापता येत नाही. ज्यांनी भातशेती कापण्याचा प्रयत्न केला त्याची कापलेली भातशेती शेतातच भिजल्याने अनेक शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पहात आहेत. परंतु गुरुवार दि. २२ ऑक्टोबर २०२० रोजी मेघगर्जनेसह पडलेल्या धुवाधार पावसाने भातशेतीची पूर्ण वाताहत झाली आहे. या दिवशी केवळ एक तासात ७६.६० मि.मी. पावसाची नोंद झाली. 

या पावसाने भातशेती पूर्ण आडवी झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदर लॉकडाऊन, त्यानंतर ३ जूनचे निसर्ग चक्री वादळ आणि त्यात घरांची, झाडांची, गाईगुरांच्या गोठ्यांची झालेली पडझड यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी वर्ग अजूनच खचला आहे. चक्रीवादळात लाखो रुपयांचे घरांचे नुकसान झाले असताना शासनाकडून दहा ते पंधरा हजार रुपयांची मदत मिळाली आणि आता वर्षभर काबाडकष्ट करून हाती आलेले भातशेतीचे पीक तेही पावसामुळे गेले त्यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे. निदान आता तरी शेतकऱ्यांच्या शेतीचे योग्य पंचनामे करून शासनाने शेतकरी पुन्हा उभा राहील इतकी मदत जाहीर करावी अशी येथील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

पाटणूस भिरा, विळे परिसरात पावसाची या वर्षाची ५००० मि.मी. सरासरी पूर्ण झाली असल्याची नोंद झाली आहे.

Popular posts from this blog