माणगांवात कोरोना पाॅझिटीव्ह पेशंट, सोशल मिडियावर बातमी व्हायरल; संभ्रमाचे वातावरण
माणगांव (उत्तम तांबे) :
महाड तालुक्यातील कोकरे मोरे आळी येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. महाड तालुक्यातील हा तिसरा पॉझिटीव्ह रुग्ण आहे. या ज्येष्ठ रुग्णाची कोरोना टेस्ट १० मे रोजी पॉझिटीव्ह आली आहे. या पेशंटला पॅरालिसिसचा झटका आल्याने माणगाव येथील राठोड यांच्या खाजगी रुग्णालयात ५ मे रोजी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून त्यांना ९ मे रोजी घरी सोडण्यात आले होते. परंतु त्यांना सुका खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळून आल्याने त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. १० मे रोजी या कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती माणगांवच्या तहसिलदार प्रियंका आयरे यांनी दिली आहे.
तसेच डाॅक्टर सुवर्णा राठोड यांनी ऑडिओ क्लिपद्वारे सोशल मिडियावर म्हटले आहे कि पाच तारखेला रात्री अकरा वाजता एक स्ट्रोकचा पेशंट सिटिस्कॅन रिपोर्टसह माझ्या हाॅस्पिटल मध्ये ॲडमिट झाला होता. ९ मे रोजी संध्याकाळी तो डिस्चार्ज झाला होता. ॲडमिट होता त्या काळात त्याची लक्षणे संशयास्पद (सस्पीशियस) वाटल्याने त्याचा स्वॅब घेतला होता. मी हाॅस्पिटल बंद ठेवले आहे. प्रोटोकाॅल प्रमाणे प्रशासकिय कारवाई चाललेली आहे. डाॅक्टर सुवर्णा राठोड यांनी ही माहिती दिली आहे.
राठोड हाॅस्पिटल येथील डाॅक्टर, स्टाफ यांचे मेडिकल रिपोर्ट घेऊन तपासणी केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचे सिल करण्याची शक्यता सध्यातरी नसल्याची माहीती मिळाली आहे. हा पॅरालिसीसचा पेशंट महाड येथील आहे. सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. प्रोटोकाॅल प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. कोणीही खात्रीलायक माहीती घेतल्या शिवाय अफवा, चुकिची माहीती पसरवू नये. दरम्यान, तालुक्यातील हा तिसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहे. या आधी बिरवाडी येथील महिलेचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर एकावर उपचार सुरु आहेत अशी माहीती मिळत आहे.
प्रांत, तहसिलदार व पोलीस प्रशासनाने तातडीने सावधगिरी म्हणुन योग्यतो बंदोबस्त व प्रोटोकाॅल प्रमाणे लक्ष घातले आहे. माणगांवकरांनी कोरोना विरुध्द लढताना सुरक्षित फिजीकल डिस्टंन्सिंग ठेवणे, तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणे, थुंकु नये व अत्यावश्यक गरजे शिवाय बाहेर पडू नये, गर्दी करु नये. या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अजूनही पूणे, मुंबई सारख्या शहरातून गावाकडे येण्याचे शक्यतो टाळावे. कारण गावाकडे येवूनही आपणास होमक्वारंटाईनच राहावे लागणार असून या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात सवय नसल्याने आपली गैरसोयच होणार आहे. त्यापेक्षा आपण आहात त्या ठिकाणी आणखी काही काळ सुरक्षित आहात. याचा विचार नागरिकांनी करावा. अन्यथा आपल्या बेजबाबदार वृत्तीने माणगांव पून्हा लाॅकडाऊन, बंद साठी आपणच जबाबदार ठरु. यासाठीच "चला नियम पाळूया कोरोना टाळूया".