सर्व विकास दीप संस्थेच्या वतीने पळसगांव खुर्द आदिवासी वाडीतील १३९ कुटुंबांना जीवनावश्यक किराणा कीटचे वाटप
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्यातील पळसगांव खुर्द आदिवासी वाडीतील आदिवासी समाजातील १३९ गरीब गरजू रोजंदारी करून जीवन जणाऱ्या कुटुंबांना पळसगांव खुर्द आदिवासी वाडी शाळेच्या प्रांगणात सर्व विकास दीप या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या सामाजिक संस्थेचे संचालक श्री. फादर रिची भाऊ, ब्रदर क्रांती भाऊ, फा. सुशील, कार्यकर्ते वृशांत धावटे, सौ. स्वाती मोरे, शर्मिला धाडवे, पळसगांव तलाठी सजाचे तलाठी विलास मोराळे, पत्रकार विश्वास गायकवाड, अजेश नाडकर, अनिल हिलम, रमेश हिलम, प्रकाश जाधव, मानसी कांबळे आणि पळसगांव खुर्द आदिवासी वाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या गायकवाड, गांगवली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघमारे यांच्या हस्ते शासनाच्या कोरोना विषाणू मुक्तीच्या पार्श्वभूमीवरील लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी आणि सोशल डिस्टंन्सच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून उपरोक्त संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत जीवनावश्यक किराणा वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले.
देशातील कोरोना विषाणूच्या संसर्ग प्रतिबंधक पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे माणगांव तालुक्यातील सर्व प्रकारच्या परिवहन सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे माणगांव बाजारपेठेतील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आणि केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत चालू असतात. तालुक्यातील सर्व सरकारी, खासगी परिवहन सेवा बंद असल्यामुळे माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची प्रचंड मोठी गैरसोय होत आहे. दररोज हाताला मिळेल ते काम करून मोलमजुरी करून हातावर कमविणाऱ्या आदिवासी समाजाची या लाॅकडाऊन संचारबंदीमुळे मोठी आर्थिक कुचंबणा झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था आपल्या सामाजिक उत्तरदायित्त्वाचे व आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव ठेवून या गोरगरीब आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात आपापल्या परीने मदतीचे हात पुढे करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर माणगांव तालुक्यातील गोरगरीब आदिवासी समाजातील जनतेला जीवनावश्यक किराणा वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्यासाठी माणगांव तालुक्यातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षे आपले मौलिक योगदान देणाऱ्या सर्व विकास दीप या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संचालक श्री. फादर रिची भाऊ आणि त्यांच्या टीमने तालुक्यातील पळसगांव खुर्द आदिवासी येथील आदिवासी समाजातील १३९ कुटुंबांना मोफत जीवनावश्यक किराणा वस्तूंच्या कीटचे वाटप केले.