कुणी पाणी देतं का पाणी? आम्ही मागत नाही लोणी, आम्हाला हवंय फक्त हक्काचं पाणी.! 


टोळखुर्द ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप 



माणगांव (उत्तम तांबे) :
काळ नदीच्या तीरावर आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले दरडग्रस्त गाव म्हणजे टोळखुर्द गांव. जरी हे गांव काळ नदीलगत असले तरी येथील ग्रामस्थांना पाण्याची समस्या कायम भेडसावत असते. काळ नदी ही नावापुरतीच नदी राहिली आहे. गेली कित्येक वर्ष महाड एम्.आय् डी. सी. मधून सोडलेेल्या केमिकल मुळे नदीतील पाणी हे  पिण्यायोग्य राहिलेले नाही. गावात विहीरी आहेत पण त्यातही क्षारचं प्रमाण हे जास्त असल्याने पाणी पिल्यानंतर घशाला त्रास होतो असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच स्वदेश फांऊडेशन तर्फे एक बोरवेल मारण्यात आली. परंतु त्या बोअरवेलला आता पाणीच उरलेले नाही. अशी गावची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कुणी पाणी देतं का पाणी ? आम्ही मागत नाहीं लोणी, आम्हाला हवय फक्त हक्काचं पाणी असा टाहो फोडत टोळखुर्द ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

टोळखुर्द गावाला देवळी नळपाणी योजनेतील पाणी टोळखुर्द गावाला पुरविले जाते. परंतु मार्च महिन्यापासून एक दिवस आड पाणी पुरवठा होतो. गावची लोकसंख्या सध्या दोनशे आहे. पाण्याची टाकी दहा हजार लिटरची आहे. त्या टाकीत फक्त दोन ते तीन हजार लिटरच पाणी पुरवठा केला जातो. दहा हजार लिटर पाणी कधीच टाकीत सोडलं गेलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये २०० गावकऱ्यांना दोन ते तीन हजार लिटर पाणी कसे काय पुरणार? गावातील विहीरींतून खारं पाणी मिळतं त्यानी डाळी शिजत नाहीत. तेव्हा शासन दरबारी टोळखुर्द गावाची डाळ शिजेल का? असे म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

देवळी नळपाणी पुरवठा योजनेचे अधिकारी आणि कर्मचारी दखल घेत नाहीत. त्यामुळे आमचे लोकप्रतिनिधी, खासदार, पालक मंत्री आणि आमचे लोकप्रिय आमदार, जिल्हा परिषद सदस्य या पाण्यासारख्या गंभीर बाबीकडे लक्ष देतील का? कोरोना ठेपला दारी, पाणी नाही घरी. कोणी पाणी देतं का पणी आम्ही मागत नाही लोणी, आम्हाला हवंय फक्त पाणी, शासनाने दिलेले स्वच्छतेचे नियम पाण्याआभावी कसे पाळायचे? एक वेळ अन्न नसेल तरी चालेल पण पाण्याची, योग्य साेय करावी, योग्य विचार शासनाने करावा. दरम्यान, मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान उपवासाचा महिना चालू झालाआहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी या समस्येची दखल घेऊन टोळखुर्द ग्रामस्थांचा पाणीप्रश्न निकाली काढावा अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा ईशाराही टोळखुर्द ग्रामस्यांनी दिला आहे.

Popular posts from this blog