रेकॉर्डब्रेक अपघात, बळींचा विक्रम  

मुंबई-गोवा महामार्गावर सरकारच्या नावाने बोंबाबोंब

 रायगडात पत्रकारांचे आंदोलन 

रोहा : किरण मोरे

रायगडच्या आमदार, खासदारांचा धिक्कार असो. या सरकारचे करायचे तरी काय... खाली डोके वर पाय.. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावानं बोंबाबोंब... उपमुख्यमंत्र्यांच्या नावानं बोंबाबोंब.. पालकमंत्र्यांच्या नावानं बोंबाबोंब.... सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या नावानं बोंबाबोंब अशा घोषणांनी रायगड जिल्हा दणाणून गेला. निमित्त होते रायगड प्रेस क्लब आणि असंख्य पत्रकारांनी सरकारला जाग आणण्यासाठी केलेल्या बोंबाबोंब आंदोलनाचे. पुरती चाळण होऊन खड्यात गेलेल्या मुंबई- गोवा महामार्गांची तत्काळ दुरुस्ती न केल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराच रायगडातील पत्रकारांनी दिला.

चौपदरीकरणाचे मंदावलेले काम आणि पळस्पे ते इंदापूर मार्गावर पडलेले भयंकर खड्डे यामुळे प्रवाशांचे कंबरडे पुरते मोडले घरासमोर भजन आंदोलन आहे. गाड्यांचे स्पेअर पार्ट तुटून हजारो रुपयांचा भुर्दंड पडून तासन्तास खोळंबा होत आहे. उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेत या महामार्गावरून सरकारवर फटकारे ओढले आहेत, परंतु तरीही महामार्ग पाहणीच्या नावाखाली सरकार चालढकल करत आहे. कोकणातील जनतेला मेंढरांची वागणूक देणाऱ्या राज्य सरकारविरोधात रायगडातील पत्रकारांनी बोंबाबोंब आंदोलन केले. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागोठण्याजवळील वाकण फाटा येथे हे आंदोलन झाले. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, माजी अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, जिल्हा पत्रकार संघाचे शशिकांत मोरे, भारत रांजणकर, नागेश कुलकर्णी, अभय आपटे, विजय मोकल, अनिल भोळे, राजेंद्र जाधव तसेच शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, रोहा सिटिझन फोरमचे अप्पा देशमुख, नितीन परब आदींनी त्यात सहभाग घेतला.

आम्हाला एक वर्षांची मुदत द्या, रस्ता सुस्थितीत करू, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी फोनवरून पत्रकारांना दिले. परंतु सामंत यांच्या गोलमाल उत्तरामुळे समाधान न झालेल्या पत्रकारांनी या प्रश्नावर पुन्हा १५ सप्टेंबर रोजी घरासमोर भजन आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

२०१४ ला काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपाचे सरकार आले, पण कोकणातील लोकप्रतिनिधींचे आर्थिक हितसंबंध आड आल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग गेली बारा वर्षे रखडला आहे. बारा वर्षे रखडलेला हा जगातील एकमेव रस्ता आहे. या रस्त्यानंतर मंजूर झालेला पुणे नाशिक रस्ता पूर्ण झाला, पुणे कोल्हापूर रस्ता पूर्ण झाला, पुणे औरंगाबाद रस्ता पूर्ण झाला, ८०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग चार वर्षांमध्ये पूर्ण झाला. मुंबई गोवा महामार्ग रखडण्यामागे सरकारची उदासीनता कोकणाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आणि लोकप्रतिनिधींची निष्क्रियता कारणीभूत आहे. 

 - एस एम देशमुख

मुख्य विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद

Popular posts from this blog