स्वराज्य प्रतिष्ठान रायगड यांची गडकिल्ले मोहिम

रोहे (समीर बामुगडे) :- 
स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संघटनेने दि.16 फेब्रुवारी 2020 रोजी गडकिल्ले मोहिम प्रतापगड येथे राबवली. या मोहिमे अंतर्गत प्रबोधन कार्यक्रमाच्या स्वरूपात छत्रपती शिवरायांचे प्रामाणिक, निष्ठावंत मावळे व छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. ही मोहिम स्वराज्य प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष श्री.भास्करभाई नारायण कारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. या मोहिमेत सुमारे आठशे तरुणांनी (युवक-युवतींनी) सहभाग घेतला होता. या मोहिमेत प्रतापगड किल्ल्याचे दर्शन तर गडाच्या प्रत्येक भागाची पाहणी करण्यात आली, गडावर तरुणांचा शिवगर्जनेचा एल्गार तर एकीकडे पोवाडा म्हणत तरुण आनंद घेत होता, त्याचबरोबर व्याख्यानमालेच्या रूपाने व्यक्त्यांकडून अनेक विचारांची सांगड झाली. तसेच प्रमुख व्याख्यात्या प्रज्ञाताई घडगांवकर यांचा महिला संघटन यांच्या वतीने पुस्तक व शाल देवून सामूहिक सत्कार करण्यात आले.

वक्त्यांकडून जे मार्गदर्शन लाभले. त्यावेळी सुरेश चोरगे यांनी सांगितले की, स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संघटनेमध्ये अठरा पगड बारा बलुतेदार सर्व समूहातील मावळे निष्ठेने काम करत आहेत. तर पुढे प्रज्ञाताई घडगांवकर  म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र केवळ वाचले नाही पाहिजे तर ते प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे. शिवरायांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे मैदानात आहात तोपर्यंत हार मानू नका..!

त्यानंतर विक्कीदादा कदम म्हणाले की, मला प्रत्येक क्षेत्रातला शिवाजी महाराज व्हायचं आहे. शिवराय म्हणजे टाईम, मॅनेजमेंट, सक्सेस..! त्याचप्रमाणे संघटनेचे प्रवक्ते महेशभाई आंबवले म्हणाले की, इमानदारी ही जातीवरून ठरवता येत नाही तर मावळ्यांच्या प्रमाणिकतेवरून ठरवता येते. जिथे शिवरायांनी घाम गाळला तिथे मावळ्यांनी आपलं रक्त सोडलं हीच स्वराज्याची निष्ठा..! त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष भास्करभाई यांनी शेवटचे आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी मोहिमेला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मांडून थोडक्यात संघटनेचा सहा वर्षांचा प्रवास सांगून 2021 ला होणाऱ्या जनगणनेबद्दल बोलतांना आवाहन केलं की, येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही पाटी लावा मोहीम करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सामील व्हा.!!

शेवटी गणेश काप यांनी कार्यक्रमाची सांगता केली आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव घाडगे यांनी केले. अशा प्रकारे ही गडकिल्ले मोहिम मावळ्यांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात, उत्साहात, शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे संपन्न झाली.

Popular posts from this blog